Monday, November 26, 2007

जत्रा

आमच्या लहानपणी गावाक खूप जत्रा असत. बहुतेक प्रत्येक देवळाची एक तरी जत्रा वर्षाक असता. सगळ्यो जत्रा देवाच्यो नसतत. काही पटवाल्यांच्यो असतत. (म्हणजे जुगार खेळणाया मंडळींची असता). देवळाची जत्रा असात तर त्या देवळाच्या मानकर्‍यांची वर्सल असता. म्हणजे दरवर्षी एक एक घरातलो जाणतो माणून कामगत आंगार घेता. मग जवळपासचे धा पाच झिलगे बोलावन कामा वाटून घेतत.

जत्रेचा सगळ्यात महत्वाचा काम म्हणजे धयकालो(दहीकाला). तो करूक संच बोलावतत. मग त्यावर्षी सगळ्यात प्रसिध्द नाटक मंडळी बोलवायची. किंवा मग काही देवळात ठराविक संच असतत. जत्रेच्या दिवशी देवळाच्या खळ्यात माटव घालतत. तेच्या खाली एक बाकडो ठेवतत. ह्या Stage तयार झाला. गावात सगळ्यांका आमंत्रण, बोर्ड लावन दिलेला असता. अधिक येता जाता 'जत्रेक येवा रे सगळ्यानी' असा तोंडी आमंत्रण देत असतत. देवळाची जत्रा असली तर भजन, पालखी, कीर्तन अशे प्रकार देवळात चालू असतत. जत्रेच्या दिवशी संध्याकाळी सगळी मंडळी जत्रेसाठी येता. सगळी संध्याकाळ अगदी धमाल करतत. खाज्याची आणि भज्यांची दुकाना जोरात चलतत. पूर्वी कोकणात खुपशी दुकाना नसत. तेवा खेळणी, फुगे, रिबीनी आणि न मिळणायो अनेक वस्तू लोक खरेदी करीत. जत्रेत आकर्षण म्हणजे सोरट (लॉटरी) आणि ल्हान मुलांसाठी लाळीयां. हो प्रकार लोक कित्या विकत घेतत हेचो माका पत्या नाय.
दोर्‍यात ओवलेलो बत्तासो मुलांचा गळ्यात घालायचो. मग मुलां तो चोखीत बसतत. आणि साखर आणि लाळ सगळी कपड्यावर पडता. दुपार पर्यंत सगळे नाटकवाले आपाअपले बोजे कपळार घेवन देवळाकडे पोचतत. मग एका ठिकाणी चूल पेटवन ते जेवाण शिजवतत. रात्र होवक लागली काय नट - मंडळी निजाक गेली. देवळ्याच्या खळ्याभर मुला - बाळा पसारलेली असतत. गोंधळ जोरात चालू असता. कोण गजाली करीत वेळ घालवतत तर कोण भज्या खाज्यांच्या पाठी. पोरांबाळां खेळण्यांसाठी गर्दी करतत. रात्र चढाक लागली काय जत्रेची जागा भराक लागता. मानकर्‍यांचे बाकडे देवळात येवन पडतत. बाकी मंडळी खळांभर पसारलेली असता. दशावतारी नट, आपण ह्या गावचेच नसल्यासारखे निजलेले नायतर पत्ते खेळाक बसतत. देवळाची जत्रा असली तर रात्री पालखी, रथ किंवा तत्सम मिरवणूक असता. इतक्या गर्देतसून देवळाक तीन प्रदक्षिणा घाली पर्यंत रात्रीचे बारा एक वाजतत आणि मग मुख्य नाटकाची तयारी सूरू होता. पूर्वी नाटकाच्या मांडवाक पेट्रोमॅक्स्च्यो बत्यो टांगीत. आता लाईट लावतत. तेवा, म्हदीच एकादी बत्ती भगभगाक लागली काय कोणतरी जाणतो माणूस नाटकाचा म्हदीच उभो रवान बत्तेक पंप मारी. मग नाटकातली राजा राणी आणि मंडळी तोपर्यंत काम थांबवन एकादी विडी ओढून घेत. नाटक चालू होवच्या आदी एक पेटीवालो, एक तबलेवालो आणि एक झांजवालो माणूस गायन सूरू करीत. ते जा काय अगम्य गायत ता कलकलाटात कोणाक आईकाक नाय इला तरी नट मंडळी रंगाक बसली तेवा आणि तासा भरात नाटक सूरू होताला अशी वर्दी मिळा. मग जेंका कोणाक भ्यार भितूर जावचा असात ते रात्रीच्या काळोखात जवळपासच्या पाननीत नायतर परड्यात जावन येत. हळू हळू मंडळी नाटकाच्या दिशेन वळाक लागता. देवळाचां खळा तोपर्यंत भराक लागता. माटवाची जागा फक्त पात्रांपुरती सोडून बाकी सगळे बसान घेतत. थयसरच पेटीवाल्याबरोबर एक चादरवालो माणूस विडी फुकीत बसलेलो असता. तेचा काम म्हणजे पात्रांचा साठी चादर धरून पडदो करायचो. पेटीवाल्याचा गायन सरला काय मग गणपती आणि सरस्वतीचो प्रवेश असता. एका नटाक गणपतीचो मुखवटो लावन तेका गणपती म्हणून बाकड्यावर बसवतत. मग पोटाक मोराचो मुखवटो बांधून सरस्वती येता आणि बरोच वेळ नाच करता. मग गणपती आशीर्वाद देता. नाच चालू असा पर्यंत चादरवालो माणूस आरामात विडी ओढीत गणपती पासून सगळ्या पात्रावर धूर सोडीत बसता. तेंचो प्रवेश संपलो काय चादरवाल्यान उठान चादर पसरून धरायची की गणपती आणि सरस्वती Exit मारतत. गणपती बरोबर काही वेळा रीध्दि सिध्दी येतत नाचाक. तेंचो नाच संपलो काय मग ते थळी घेवन जत्रेत फिरवन पैशे जमा करतत. या पात्राक कोकणात 'बिलीमारो' म्हणून जास्त ओळखतत, आणि गावात जर कोणी बाई दिसान येण्या सारखो Makeup करून फिरत असात तर तिका 'बिलीमारो' ह्या नाव आपोआप पडता.

विषयांतर्: बिलिमारो, इपारो हे शब्द कशे काय तयार झाले हेची माका तरी खबर नाय. पण ल्हानपणी गावातल्या काही पात्रांक 'बिलिमारो काय गो तूं ?' असा म्हटलेला आठावता. पूर्वी दशावतारी नाटकात बायलमाणसांची कामा करणारे नट मिशी काढीत नाय. 'बापूस जीतो आसा माजो' हो विचार होतो त्यापाठी. आणि तरी लोक आवडीन मिशीयो असलेली 'सरस्वती' नायतर 'द्रौपदी' सारखी पात्रा बघीत. एकाद्यागोष्टीची सवय झाली काय मग तेचो त्रास होणा नाय. मी मात्र हो प्रकार कधी बघूक नाय. आमच्या ल्हानपणी पुरूष स्त्रीपर्ट करीत पण दाढी मिशी काढून. एका दशावतारी मंडळात तर एक बाई देखील काम करी, पण हो प्रकार पण कमीच. दशावतारी नटांची पार्टी असता. तेच्यात आठ धा पासून बारा पंधरा नट असतत. एका वेळाक शक्यतो एक कंत्राट घेतत. पण काही वेळा दोन दोन कंत्राटा घेतल्यानी काय मग थोडे इकडे थोडे तिकडे असो प्रकार होता. पण असतीत ती मंडळी वेगवेगळे रोल करून नाटक पुरां करतत. गणपती सरस्वतीचो प्रवेश झाल्या नन्तर मुख्य आणि ल्हान मुलांच्या आवडीचो प्रवेश म्हणजे 'शंकासूराचो' प्रवेश. शंकासूरान ब्रम्हदेवाचे वेद चोरले ही गोष्ट तुमका सगळ्यांका ठवक असतली. पण वेदा बिदांची गोष्ट जावंदे. शंखासूर एकदम प्रेक्षकातसून हाणामारी करीत येता. आधीच तो दैत्याचो वेष, त्यात मोठ्ठो आवाज आणि हातात तलवार घेवन येणारो हो दैत्य बघून ल्हानसान पोरां घाबारतत. मग 'शंकासूराचो' थोडो पांचट आणि थोडो विनोदी असो संवाद असता. सगळे भरपूर हसान घेतत. मग देवांची आणि संकासुराची लढाय होता, आणि हो दैत्य मरान पडता. चादरवालो माणुस उठान चादर धरता आणि शंकासूर त्या चदरी पाठी लपत लपत नायसो जाता. दशावतारी नाटक हो प्रकार एक कठीण काम असता. एक तर लेखी 'नाटक' नसता. पात्रां अनुभवान आणि गोष्टीच्या संदर्भान आपल्या मनचे संवाद म्हणतत. तेवा वेळाक स.वाद सुचाक होयेत. रोज वेगळ्या ठिकाणी वेग वेगळे प्रयोग असतत म्हणजे आजचे संवाद उद्या वापरूक येतीतc हेची खात्री नसता. परत, नाटक रात्री एक वाजता सुरू झालां नायतर तीन वाजता सुरू झालां तरी फाटेपर्यंत सुरू थेवचा लागता. म्हणजे कधी गाणी, लढाय, संवाद घालून वाधवायचा तर कधी संवाद कमी करून आटपायचां अशी कसरत असता. परत नट कमी असले तर एक नट दोन दोन कामां करतत. राणीचा काम करणारो नट जर नारदाचाय काम करीत असात तर तेका म्हदी कपडे बदलूक वेळ देवचो लागता. असे अनेक व्याप असतत. प्रयोग सूरू करण्या आधी ह्या सगळ्याचो विचार करूनच कथा ठरवतत. कारण दशावतारी नाटक ह्या फक्त दशावतारी नाटकच असता. तेचो विषय आधी सांगणत नाय. निदान पूर्वी तरी सांगीत नाय. ह्या सगळ्या पूर्वतयारी नंतर मुख्य आणि महत्वाचो भाग म्हणजे दशावतारी नाटक. नाटकाची कथा ही पौराणिक असता, किंवा रामायण महाभारतातली असता. काही वेळा काल्पनिक कथा असता. मी गेलेल्या बयाच नाटकांची सुरूवात अशी होती. 'राजा' Entry मारता आणि ' या या अवंती नगरीत पाऊल टाकताच मनाला कसे समाधान होत आहे? आणि का बरे होणार नाही ?' ह्या वाक्य लिण्यापेक्षा म्हणानच दाखवक होयां. मग काही वाक्या ही 'प्रजा कशी सुखात आसा, राज्य कसा बरां चललहां वगैरे वर्णन. त्यात नट जरा गाणारो असलो आणि वेळ भरपूर असलो तर मग एकादा 'मनाला समाधान' दाखवणारां गाणा वगैरे होता. नाटकाच्या कथेत राणी असली तर मग राणीची Entry . मग राणीचा काम करणारो नट तेका जमात तितको बायकी आवाजात चार दोन प्रेमाचे सुखाचे डायलॉग बोलता. हय एक लक्षात थेवक होयां की ह्या नटांचे आवाज रोज रात्रीची जागरणा, कमी जास्त पीणा, दैत्याची कामा करताना जोरा जोरात ओराडणा मुळे पार गेलेले असतत. तरी पण मग राजा राणीचा एखादा गाणा होता. मी ल्हानपणी बघितलेल्या नाटकात असाच एक गाणा होता 'मन मोहुनिया जासी कुठे दूर साजणा, पाहुनिया लपसि कुठे मनमोहना' फुडचा काय आठावणा नाय. आणि मग प्रधानजीची entry

राजाः परधानजी, आपल्या राज्याची येवस्था कशी काय हाये?

कोकणात सगळेच कोकणी बोलतत. आता नाटक जरी मराठीत केला असला तरी म्हदी म्हदी मालवणी शब्द किंवा अशुध्द मराठी चलता. इकडे प्रधानजीक पाऊल परतूक जागा नाय. कारण तोपर्यंत प्रेक्षक मंडळी अगदी तेच्या पायात येवन बसलेली. मग प्रधानजी नाटक सोडून प्रेक्षकांक 'वायंच जरा मारून घेवा' (म्हणजे पाठी सरका) म्हणून पाया पडत असता. मग राजा देखील प्रधानजीच्या मदतीक येवन नाटकासाठी जागा मागाक लागता. शेवटी कशी बशी जरा जागा करतत आणि मग राजा परत 'राज्याची येवस्था' च्या मागे लागता.
राजाः परधानजी, आपल्या राज्याची येवस्था कशी काय हाये
प्रधान्: येवस्था उत्तम आहे महाराज, सगळे लोक आनंदात आहेत, धनधान्य भरपूर आहे, रोग राई शाप (पुर्णपणे) नाहीशी झालेली आहे...

ह्या सगळा वर्णन चालू असताना राजा 'होय होय', 'होय होय' अशी मान हलवता. वेळ असात तर एक हात तलवारीवर आणि एका हातान मिशी पिळीत चार फेरीये मारता. पण नाटक म्हटला काय सगळा सरळ सरळ असान चलणा नाय. मग बोलता बोलता प्रधान 'पण' वर येवन थांबता.

राजा: पण पण काय प्रधानजी? निर्भयपणे सांगा.
प्रधान्: पण आपल्या राज्यात दैत्याने थैमान घातले आहे...
राजा: दैत्य? माझ्या राज्यात दैत्य? (म्यानेतसून तलवार उपशीत) मी त्या दैत्याला ठार मारून टाकतो.

मग राजा तलवार उपसून दणादण पाय आपटीत थयथयाट करता. अशा वेळाक मागे पेटी, तबला आणि झांजवालो एकदम जोर काडून हत्यारां वाजवतत. चादरवालो मात्र शांत बसान विडी ओढीत असता. ह्या सगळ्या गडबडीत प्रधान दोन चार वाक्या बोलान परत जाता आणि मग दैत्याची Entry . दैत्य मात्र अगदी खरोखर दैत्य असात असो असता. पिंजारलेले केस, तोंडावर राखेचे पट्टे, मोठ्ठे डोळे, टीपेचो आवाज आणि हातात तलवार घेवन दैत्यान केली की ल्हान पोरांची नीज पळता. मग दैत्या थोडो वेळ दाण दाण करीत थैमान घालता. तेचा लातेच्या फटक्यातून समोर बसलेले प्रेक्षक सुटनत नाय. तोपर्यंत एकी कडे राजाचां आणि दैत्याचा संभाषण चालू असता. ते एकामेकांक 'आव्हान' देत असतत. राजा आणि दैत्याच्या लातानी जरा जागा मोकळी होता आणि मग एकदम लढायेक सूरूवात. जत्रेतल्या नाटकातली लढाई मात्र बघण्यासारको प्रकार असता. आज इतक्या वर्षानी नाटकातले इतर बारकावे आठावले नाय तरी लढाई मात्र अगदी डोळ्यासमोर आसा. ही लढाई ही नेहमी तलवारीन करूची असता. अगदी राम रावण युध्द असलां आणि ता युध्द धनुष्य बाण वापरून केल्याचो इतिहास असलो तरी सुध्दा. कारण धनुष्य बाणान केलेली लढाई ही तितकी रंगाची नाय. एक तर जागा अपुरी आणि बाण मारण्याचो प्रसंग रंगवणा तेच्यापेक्षा कठीण. लढाईची सुरुवात म्हणजे झांज आणि तबल्यावर ताल धरायचो. पेटीवाल्याचा गायन आणि लढाई करणारी पात्रा हातात तलवार घेवन नाचतात. थोडो नाच झाल्यावर मग ताल वाढाक लागता आणि मग तलवारी एकमेकांवर आपाटतत. तितक्या वेळात गायन जोरदार चालू असता. ह्या गाण्याचो आणि नाटकाचो नकी संमध काय हेची काय वर्ता नाय पण कधीतरी एक मी आक्यायका आकललय ती अशी.. एका दशावतारी नाटकात कृष्ण आणि अर्जून ह्यांचा युध्द होता. आणि युध्दात अर्जूनान पडायचा असा ठरलला होतां पण त्या दिवशी नाटकाच्या आधी कृष्णाच्या पार्टीचा आणि अर्जूनाच्या पार्टीचा भांडाण झालेला. तेवा अर्जूनाच्या पार्टीन 'आज मी बरोब्बर देखवतंय' अशी प्रतिज्ञा केलेली. तो कसोच पडाक तयार नाय. पेटीवाल्यान बरोच जोर मारल्यान, पण अर्जून काय थांबयना. तेवा शेवटी पेटीवाल्यान नविन गाणा काढल्यान 'अर्जूना मायझयां पडान घे' राजाची आणि दैत्याची मारामारी होता. मग तेच्याच कोणाचो तरी एकाचो प्राण जाता. मग तो पडल्याची Acting करता. आता मात्र चादरवालो माणूस शांतपणे उठान चादर धरता. मग उरलेली रात्र राजा, राणी प्रधान हेंची गाणी, राजा, राजपूत्र आणि दैत्य वगैरे मंडळींची मारामारी, आणि देवादिकांचे आशीर्वाद असा नाटकाच्या गोष्टीप्रमाणे चालू असता. फाट दिसाक लागली काय नाटक आवरता घेवन जो काय शेवट दाखवचो तो दाखवतत. कोकणात पूर्वी आणि खरांतर आता सुध्दा रस्त्याक दिवाबत्तेची सोय नसता. आणि रात्रीची वेळाक किरडूवांची भिती असता. तेवा नाटक सकाळपर्यंत सूरू ठेवची प्रथा पडली असात कदाचित. नाटकाच्या दुसया दिवशी पूर्ण गाव निजलेला असता. रात्रभर केलेला जागराण ह्या आजून दोन दिवस उतारणा नाय. जवळपासच्या शाळांक सुट्टी असता. मंडळी सुस्तावलेली असता. नाटकाचे दर्दी आणि माहेतगार प्रेक्षक हे, नाटक ह्या विषयावर तिठ्यावरच्या हाटेलात बसान तावा तावान अर्चा करतत. आदीच कोकणी माणसाक मत मांडूक सांगाक नको. तेच्यात नाटकासारखो आवडीचो विषय. ' खंयच्या पात्रान काय चूकी केल्यान' पासून 'अमक्या तमक्या पार्टीचा काम कसा उत्तम असता' पर्यंत चर्चा तांबड्या चहाच्या गलासाबरोबर 'पेमाच्या' नायतर 'बालीच्या' हाटेलात चलतत. 'अरे तू बाबीचा काम बघलहस नाय, काय समाजलां ?' 'पण कायय म्हणा पण xxx सूराच्या पार्टीत दम नाय. मेल्याचो आवाज शापच पिचपिचीत मारे' 'अरे लढाय मारूक जमाक नको कायतरी काय ?' 'तरी मिया तेंका सांगा होतय, 'राम रावण' आख्यान नको म्हणान पण आमचो राजगो ऐकयना' .... आणि तितक्यात कोणतरी येवन पुढच्या जत्रेची खडवान रंगवलेली पाटी लावन जाता.

Wednesday, November 21, 2007

लेडी पोलिस

सदा मित्रांचा 'टोळक्यात' बसून 'गजाली' करत होता तेवढ्यात रस्त्यावर हवालदार दिसला. 'भाजीबाजारात' हवालदार दिसणे ही काही अपूर्व घटना नव्हती त्यामुळे सर्वानी त्याला पाहिलं असलं तरी गजालींचा विषय तसाच चालू राहिला. काल रात्री झालेल्या मारामारीचा. सदा कोणाचीतरी कशी खेचली हे रंगवून सांगत होता, आणि बाकी मंडळी खिदळत होती. 'अरे, मियां तुका सांगतय, तो परत माझ्या वाटेक कदी येवचो नाय. माका शिकवता. राग इलो तर बापाशीक बापूस म्हणाचय नाय मी. काय समाजला?'

खरं सांगायचं तर सदा हा आमच्या गावातला एक बेकार तरूण. शाळेच्या दिवसात शाळेपेक्षा इतर गोष्टीमध्ये लक्ष असायचं त्याचं. पायात साधं बाटाचं स्लीपर घालून माडावर चढायचा तो. तो शाळेत असेपर्यंत शाळेच्या आवारातल्या माडावरचे 'बोंडे' कधी नाहीसे होत कळत नसे. कसा बसा ढकलत ढकलत पाचवी पर्यंत शाळेत गेल्यानंतर सदाने शाळा सोडली आणि तो S.T. स्टँडवर दिवसभर फिरायला मोकळा झाला. उन्हाळ्यात कोकणात सुट्टीसाठी येणार्‍या चाकरमान्याना परत जाताना मुम्बई गाड्यांवर शीटा मिळवून देणे, प्रायवेट गाड्यांची तिकिटे ब्लॅक करून तिकिटामागे पाच धा रूपये कमावणे, दुबईहून आलेल्या लोकांची घड्याळं, टेप इत्यादी सामान ब्लॅकमध्ये विकून देणे, असे बरेच उद्योग तो करत असे. (ब्लॅकच्या धंद्यामुळे त्याला सदा "काळे" म्हणून ओळखत असत.) कसंबसं पोट भरेल एवढे पैसे त्याला सुटत असत. बाकी वेळ मित्रांबरोबर बसून मोठ - मोठ्या गजाली करणे, मोठी मोठी स्वप्नं बघणे यातच सदाचं बालपण कधी गेलं ते त्यालाही कळलं नाही. थोडक्यात सदाच्या आयुष्यात सांगण्या सारखं काही विशेष नव्हतं. पण हल्ली मात्र सदामध्ये बराच फरक दिसून येत होता. पूर्वी जे लोक त्याला काडीचीही किंमत द्यायचे नाहीत ते हल्ली 'कसां काय सदा ?' असं विचारू लागले होते. 'चाय'च्या हाटेलाचा मालक पूर्वी चहा देण्याआधी 'आमी उदारी बंद केली हा' असं बीनधास्तपणे सांगत असे तो आता काही न बोलता चूपचाप 'उधारी' करू देत होता. सदा सारख्या इतर अनेक तरूणांच्या टोळक्यामधे का असेना सदाला 'भाव' होता. कोकणात गेल्या काही वर्षात 'श्रीसेने'चा प्रभाव वाढत होता. पूर्वी चाकरमान्याच्या 'खोली' आणि 'चाळी'तून आलेली 'श्रीसेना' हळूहळू आपले पाय त्यांच्या घरात म्हणजे 'कोकणात' पसरत होती. गावा गावात 'श्रीसेने'च्या कचेर्‍या उघडत होत्या. पूर्वी 'रिकामटवळी' फिरणारी बरीच तरूण पोरं आता 'श्रीसेने'त सामील झाली होती. सदा हा असाच एक तरूण. पोटापाण्याचा काही उद्योग मिळेल या आशेने सेनेच्या कचेरीत पोहोचला. आणि त्यांचे जाहीरातींचे फलक रंगवता रंगवता एका 'निवडणूक' हंगामात एकदम 'लीडर' झाला. खरं तर तो 'लीडर' आहे असं त्याला कोणी सांगितलं नव्हतं. 'श्रीसेने'ची गावची कचेरी सोडली तर त्याला बाहेर कोणी ओळखला नसता. पण ऐन निवडणूकीच्या धामधूमीत काही पैसे खिशात खुळखुळायला लागले होते. चार दोन स्थानिक आणि एका दोघा राज्यस्थरावरच्या पुढार्‍यांबरोबर प्रचाराला जायला मिळाल्यामुळे त्याचा 'भाव' वधारला होता. प्रचारा - निमित्त पंचक्रोशीत कुढे पोस्टर लाव, कुठे हँडबिलं वाट अशी फुटकळ काम तो अभिमानाने करत होता. निवडणूक आली आणि गेली सुध्दा. पण सदाच्या अंगातून 'श्रीसेना' उतरली नाही. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे झालेल्या संपात काही पुढार्‍यानी 'रस्तारोको' आंदोलन केलं तेव्हा लागणार्‍या गर्दीत सदा होताच. त्यात कोणातरी पुढार्‍याला पाणी देताना सदाचा फोटो पेपरात आला. त्यामुळे सदा स्वतःला 'लीडर' समजायला लागला. आंदोलनात रस्ता अडवणार्‍या पुढार्‍याना पोलिसानी अटक केली, तेव्हा सदाने 'झाळकी'त दडी मारून मागच्या मागे पळ काढला हे गावातल्या पोरा - पोराना देखील माहित होतं, पण सदा मात्र 'काय छाती त्या इंस्पेक्टराची माका अटक करूची, मी तोंडार थुकतय त्या xxxxx च्या' असे लोकाना ऐकवत फिरत होता. लोकही त्याला 'तुजी काय बुवा, घसण आसा बाळ्याबरोबर' असं चढवत होते. पण मागून मात्र 'कोण, सदगो, मेलो झाळकेत दडान पाटच्या पाटी पळालो म्हणून सुटलो हां, आमका सांगता गोष्टी. पोलिसानी सगळ्यांच्या समोर कानफाटात मारल्यानी तेच्या' अशी बातमी गावात पसरली. खरं तर 'रस्तारोको' मध्ये अगदी थोड्या लोकानी भाग घेतला होता पण आता सगळे एकामेकाना 'मी थंयच कसो उभो होतय, स्वतःच्या डोळ्यानी कसां बघलय' हे ऐकवत होते. हे पण सदाला माहित नव्हते असे नाही. लोकानी तोंडावर केलेली प्रशंसा ऐकून सदाची छाती आणि 'लीडरगिरी' अजून फुगायला लागली. पूर्वी 'सदगो' म्हणून ओळखला जाणारा सदा आता 'लीडर सदा' म्हणून ओळखला जात होता.

त्यामुळे येणार्‍या हवालदाराकडे एक कटाक्ष टाकत सदाने आपली गोष्ट पुढे चालू ठेवली. पण हवालदार काही कच्चा नव्हता.

त्याने आल्या आल्या डाफरायला सुरुवात केली. 'तुमच्यात सदानंद साटम कोण आहे ?'
'सदानंद साटम कोन सदानंद साटम?' कुणी तरी उत्तर दिले. सदाचे पूर्ण नाव काय ते सदालाही पटकन आठवले नसते.

'हां, म्हणजे सदा, सदा "काळे", हो काय हंय बसलोहा'
'मी मी सदा, काय काम आहे ?', सदाने लगेच टेचात विचारले.
'चला, तुम्हाला इन्स्पेक्टरसाहेबानी बोलावलय' हवालदार पुढे होत म्हणाला.
'कित्याला म्हन्जे आपलं कशाला त्यांचं माझ्याकडे काय काम हाये ?' सदाची गुर्मी.
'चल, पोलीस ठाण्यावर मग सांगतो', हवालदाराला असली गुर्मी ऐकायची सवय नव्हती.
'नाय येत, काय करशील ?' आता सगळ्याना सदा काय करतो याची उत्कंठा लागली. सदाला ही जमाव बघून जोर चढला. सदा एकदम मातृभाषेवर आला 'काय करशीत बोल?'
'चूपचाप माझ्या बरोबर चल' ,म्हणत म्हणत हवालदार पुढे होऊन त्याची कॉलर धरणार तेवढ्यात
'ए, आंगाक हात लावायचो नाय काय समाजलस, Lady Police आल्याशिवाय हात लावायला देणार नाही'. 'काय ?', पुढे होणारा हवालदार देखील एक क्षण बावचळला, 'काय म्हणालास ?'

' Lady Police आल्याशिवाय हात लावायला देणार नाही'. जमलेली मंडळी ही नवीच गम्मत ऐकून खदा खदा हसू लागली. हवालदाराला देखील हसू आवरेना. पण त्याला त्याचं काम करणं भाग होतं. भाजीबाजारात आता बघ्यांची गर्दी वाढायला लागली. सदाची दादागिरी आणि आजूबाजूची गर्दी बघून हवालदाराने माघार घेतली. सदाला अजूच चेव चढला.

पोलीस निघून गेल्यावर तर त्याने शिव्या आणि वल्गनांचा पाऊस पाडला. बाकी लोक सदाला अजून चढवत होते आणि सदा पेटत चालला होता. सदाचा हा जोर ओसरतो न ओसरतो तोच पोलिसांची जीप भाजीबाजारात आली. जीप मधून एक इन्स्पेक्टर आणि मघाचा हवालदार उतरले. सदा आणि त्याचे काही मित्र अजूनही मघाची जीत साजरी करत होते.

'सदा साटम कोण आहे?' इन्स्पेक्टरने आपल्या पोलीसी आवाजात विचारले. हवालदाराने लगेच सदाकडे बोट दाखवले.

'तू सदा काय ?'
'मी...मी सदा, काय काम आसा?'
'माज आला काय रे?' म्हणत इन्स्पेक्टरने सरळ त्याच्या कॉलर हात घातला.
'ए, आंगाला हात लावायचा काम नाय'. इन्स्पेक्टरला असली भाषा ऐकायची सवय नव्हती. त्याने कॉलरसकट सदाला उचलला. ' Lady Police आल्याशिवाय अंगाला हात लावायचा नाही...', सदा वळवळत म्हणाला. तो पुढे काही बोलला असता पण तेवढ्यात इन्स्पेक्टरने मारलेली सणसणीत थप्पड भाजीबाजारात सगळ्याना ऐकू आली. हे प्रकरण सिरीयस दिसतय हे लक्षात आल्यावर बहुतेकानी काढता पाय घेतला. मांजरीच्या पिल्लासारखं मानगुटीला धरून पोलिसानी त्याला जीपमध्ये कधी टाकला आणि जीप पोलिसठाण्याला कधी गेली हे कुणालाच कळलं नाही.

दोन चार दिवसानी सदा सुटला आणि पुन्हा गावात फिरायला लागला. आता पुन्हा त्याच्या मित्राना चघळायला एक नवीन विषय सापडला. टोळकं जमलं आणि नेहमी प्रमाणे चर्चा सूरू झाली. सदा नेहमीप्रमाणे आपल्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकवत बसला होता. पोलिसानी सदाला चांगलाच चोपला आहे हे सदाच्या सुजलेल्या थोबाडावर दिसतच होते. मित्रानी पोलिसांचा विषय काढायचा नाही असे ठरवले असले तरी त्याना राहवेना. मग कुणी तरी सुरूवात केलीच.

'सदा, ती... पोलिसांची भानगड काय ?'
'काय नाय रे, ती रात्री मारामारी झाली ती भानगड'
'पण तुका कित्याक मारल्यानी ?'
'इन्स्पेक्टराक राग इलो. मी Lady Police मागलय म्हणून. तेचा कपाळ फिरलेलां. मेलो हसा आणि माज्या कानपाटात मारी परत कानपाटात मारी आणि हसां, मेल्यान मारून मारून मजो जीव काडल्यान पण माका बोलाक देयना मारे. नायतर मी तेका बरोब्बर सुनावला असता.' यावर जमलेल्या सगळ्या मित्रानी सदाच्या भावनांची कदर न करता हसून घेतले.

मग कुणीतरी हळूच विचारले, 'पण, सदग्या तुका मेल्या Lady Police कित्याक ?'
'कित्याक म्हन्जे, मी 'लीडर' आसय 'श्रीसेनेचो', काय समाजलस' 'अरे होय, तू लीडर आसस. पण म्हणून काय झालां ?'
'अरे, परवाच्या संपात ती विमलताई कुमठेकर नाय इलेली. ती मोठ्ठी लीडर आसा, तिना पण सांगलेन Lady Police होई म्हणून'
'अरे मेल्या तिचा म्हणणा बरोबर पण तू तर बापयो आसास मारे तुका Lady Police म्हणजे काय ता समाजता?'
'मगे, मोठ्या लीडराक मोठी पोलीस नको ?'
'अरे मेल्या सदग्या, lady police म्हणजे मोठ्ठी पोलीस न्हय, Lady म्हणजे बायलमाणूस' यावर हास्याची ही कारंजी उसळली आणि सदाला आपला गाढवपणा कबूल करावा लागला नाही.
बर्‍याच मित्रांनी सांगितलं... काहीबाही लिहीत असतोस, वाचायला दे ना... एक पुस्तक लिहून झालं, पण अजून बरंच काही लिहावं वाटतं... तेव्हा इथे श्रीगणेशा....